हिंगणघाट बाजार समितीची स्थापना १८ जानेवारी १९४० रोजी झाली असून त्यावेळेस हि समिती "कॉटन मार्केट कमेटी" ह्या नावाने ओळखल्या जात होती. पुढे १९६३ साली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा अस्तित्वात आला व त्यानंतर १९६७ पासून हि समिती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जात आहे हिंगणघाट बाजार समितीचे पूर्वीचे कार्यक्षेत्र जुना हिंगणघाट तालुका ज्यामध्ये हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याचा समावेश होता. शासनाने जुलै १९९८ साली हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याचे विभाजन केले व त्यावेळेपासून ह्या समितीचे कार्यक्षेत्र फक्त हिंगणघाट तालुक्यापुरते मर्यादित आहे.
हिंगणघाट बाजार समितीने कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मुंग, तीळ, गहू, जवस, एरंडी, गुरेढोरे इत्यादी शेतमालाचे नियमन केले आहे. मात्र या बाजारपेठेत कापूस, सोयाबीन, तूर चना, गहू ह्या शेतमालाची प्रामुख्याने आवक आहे. हिंगणघाट बाजार समितीचे मुख्य यार्ड हे शहराचे मध्यभागी आहे. मुख्य यार्ड नझूलच्या ७ एकर जागेत उभारण्यात आले असुन येथे कापूस बाजार व गुरांचा बाजार भरत असतो. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरती समितीचे धान्य यार्ड असुन तो समितीच्या मालकीच्या २० एकर जागेमध्ये व्यापलेला आहे. सदर यार्ड छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड म्हणून ओळखला जातो. या व्यतिरिक्त समितीने वडनेर येथे ८ एकर जागेवरती तर कानगावं येथे ४ एकर जागेवर उपबाजाराची निर्मिती केली आहे.